Wednesday, November 25, 2020

जागर भारतीय संविधानाचा- डॉ. राम ढगे.

                
              "जागर भारतीय संविधानाचा" 
                                       डॉ. राम ढगे.


           15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश साम्राज्यसत्तेविरूद्ध प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याची सांगता झाली. आणि भारतामध्ये परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले.भारत एक स्वतंत्र सार्वभौम राज्य बनले. स्वतंत्रता,सार्वभौमत्व प्राप्त झाल्याने उदयन्मुख भारताचे सर्व प्रश्न सुटले नव्हते.एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपले स्वातंत्र्य टिकविण्याचे आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करण्याचे कार्य भारताला करायचे होते. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्त्वांवर आधारलेली लोकशाही निर्माण करण्याचे कार्य करायचे होते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्राची उभारणी कोणत्या तत्त्वावर करायची यासंबंधीच्या कल्पना स्वातंत्र्यलढ्याच्या काळातच स्वीकारण्यात आलेल्या होत्या.या कल्पना व ब्रिटिश सरकारच्या मदतीने भारताची राज्यघटना निर्माण करणे हा त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केलेला प्रयत्न आहे.स्वतंत्र भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली.आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 पासून भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासन पद्धतीचा स्वीकार करून एका नव्या युगात प्रवेश केला. कोणत्याही लहान मोठ्या संस्थेचे कार्य सुरळीतपणे व विकासाच्या दिशेने चालावयाचे असेल तर त्या संस्थेला विशिष्ट नियमांची आवश्यकता असते.विशिष्ट नियमांमुळे संस्थेची उद्दिष्टे निश्चित काळात पूर्ण होऊ शकतात. अगदी या उदाहरणाप्रमाणेच एखाद्या राज्याचा राज्यकारभार सुरळीतपणे व विकासाच्या दिशेने चालवायचा असेल तर त्या राज्यांमध्ये नियमांची आवश्यकता असते.असेही म्हटले जाते की,राज्याचा राज्यकारभार एका विशिष्ट आणि सर्वमान्य नियमानुसार चालला तर राज्यातील लोकांचे जीवन सुखी आणि समाधानी होते. राज्याच्या कारभारासाठी तयार केलेल्या नियमांच्या किंवा कायद्यांच्या संचाला राज्यघटना असे म्हणतात. कोणत्याही राज्याची राज्यघटना ही त्या देशाचा इतिहास, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती,लोकांच्या आकांक्षा, राजकीय नेत्यांचे दृष्टीकोन अशा घटकांच्या एकत्रित परिणामातून निर्माण होत असते.भारतीय राज्यघटनाही त्याला अपवाद नाही.भारतीय स्वातंत्र्य चळवळ,स्वातंत्र्य चळवळीतील राजकीय नेत्यांचे दृष्टीकोन आणि पारतंत्र्यात पिचलेल्या जनतेच्या अपेक्षामधून भारतीय राज्यघटनेची निर्मिती झालेली आहे. भारतीय राज्यघटनेत राज्याची उद्दिष्टे,नागरिकांचे हक्क,शासनाच्या विविध अंगाची रचना,त्यांचे अधिकार व त्यांच्यातील परस्परसंबंध या बाबींचा समावेश होतो. भारताची राज्यघटना केवळ शासन संस्थेचे रचना अधिकार सांगणारे नियम नव्हेत तर भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांनी लोकशाहीची प्रस्थापना सामाजिक आर्थिक परिवर्तन राष्ट्रीय एकात्मता ही तीन उद्दिष्टे समोर ठेवून निर्माण केलेली परिवर्तनाची एक नांदी आहे. लोकशाही,सामाजिक-आर्थिक विकास आणि राष्ट्राची एकात्मता या बाबी एकमेकांपासून अलग नाहीत. सामाजिक-आर्थिक विषमता आणि मागासलेपणा दूर होण्यासाठी लोकशाहीचा विकास झाला पाहिजे.आणि सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून आले तरच राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल.म्हणून भारतीय राज्यघटनेत केलेल्या तरतुदी याच उद्देशाने केलेल्या आहेत.भारतीय राज्यघटनेचे वर्णन करताना ग्रँनव्हील ऑस्टिन या अभ्यासकाने भारतीय राज्यघटनेला राष्ट्राची आधारशीला असे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेतील तत्वे,उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे घटनाकरांना अपेक्षित होते. परंतु आपण आज पाहतो भारतीय राज्यघटनेबद्दल देशातील सर्व नागरिकांमध्ये म्हणावी तेवढी जागृती झालेली दिसून येत नाही. परिणामी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आजही प्रभावीपणे होताना दिसून येत नाही.यासाठी भारतीय संविधान,संविधानातील तत्वे,उद्दिष्टे देशातील जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक वाटते. यासाठीच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतातील अशिक्षित, गरीब, मागासलेल्या समाज घटकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचवणे ही समाजातील शिक्षित वर्गाची, राजकीय पक्षांची तसेच विविध समाजसेवी संघटनांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्व घटकांनी प्रभावीपणे पार पाडावी हीच संविधान दिनानिमित्त अपेक्षा आहे.

Wednesday, September 9, 2020

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

 

               राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

 

१. शालेय शिक्षण

अ. प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण: सदर धोरण प्रारंभिक वर्षांच्या महत्वावर भर देते आणि २०२५ सालापर्यंत ३ ते ६ वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील दर्जेदार निगा व शिक्षण दिले जात असल्याची दक्षता घेणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. याकरिता गुंतवणुकीमध्ये लाक्षणिक वाढ करून नवनवीन उपक्रम राबविण्याचाही या धोरणाच्या उद्दिष्टामध्ये समावेश आहे.

आ. पायाभूत साक्षरता व अंकज्ञान: इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रारंभिक भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरविले जाईल. सन २०२५ पर्यंत इयत्ता पाचवी व त्यापुढील इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता घेणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

इ. अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र: शालेय शिक्षणासाठी ५+३+३+४ रचनेवर आधारित बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्त्वांवर आधारित एक अभिनव विकासात्मकदृष्ट्या योग्य अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र रचना विकसित करण्यात आली आहे. शाळांमध्ये विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, क्रीडा, गणित इ. सर्व विषयांवर समान भर देताना व्यावसायिक (पेशाविषयक) व शैक्षणिक शाखांचे एकीकरण करण्यात येईल.

ई. वैश्विक प्रवेश: सन २०३० पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये १००% ग्रॉस एनरोलमेंट रेशो (म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर) आत्मसात करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

उ. न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षण: जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडित परिस्थितीमुळे कोणतेही मूल शिकण्याच्या व प्रगतीच्या एकाही संधीला मुकणार नाही, याची हमी देण्यासाठी या धोरणामध्ये अनेक नियोजित उपाययोजना अंतर्भूत आहेत. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष शिक्षण झोनदेखील उभारण्यात येतील.

ऊ. शिक्षक: शिक्षकांची नेमणूक अतिशय सक्षम व पारदर्शक प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. शिक्षकांना गुणवत्तेच्या निकषांनुसार बढती देण्यात येईल. कामगिरीचे बहुस्रोतांवर आधारित नियमित मूल्यमापन करण्यात येईल आणि शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षकांचे शिक्षक होण्यासाठी श्रेणी प्रगमनाचे (प्रोग्रेशन) मार्ग उपलब्ध असतील.

ऋ. शालेय अनुशासन: शाळांची व्यवस्था व आयोजन शालेय संकुलांमध्ये (शालेय संकुल म्हणजे १०-२० शासकीय शाळांचा समूह) करण्यात येईल. अनुशासन व प्रशासन यांचे हे मूलभूत एकक असेल. याद्वारे सक्षम व्यावसायिक शिक्षक समुदायासोबतच पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), शैक्षणिक सुविधा (उदा.ग्रंथालये) व मनुष्यबळ (उदा. कला व संगीत शिक्षक) अशा सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता होत असल्याची दक्षता घेता येईल.

ल. शालेय विनियमन: स्वारस्यसंघर्ष टाळण्याहेतू शाळांचे विनियमन व प्रचालन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल. धोरणनिर्मिती, विनियमन (रेग्युलेशन), प्रचालन (ऑपरेशन्स) व शैक्षणिक बाबींकरिता सुस्पष्ट व स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात असतील.

२. उच्च शिक्षण

अ. नवीन संरचना (आर्किटेक्चर): विशाल, सर्वसाधनसमृद्ध, चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज संस्थांद्वारे उच्च शिक्षणासाठी नवीन दूरदृष्टी व संरचना (आर्किटेक्चर) परिकल्पित करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेली ८०० विद्यापीठे व ४०,००० महाविद्यालये सुमारे १५,००० उत्कृष्ट संस्थांमध्ये संकलित करण्यात येईल.

आ. उदारमतवादी शिक्षण: विज्ञान, कला, मानवतावाद, गणित व व्यावसायिक क्षेत्रांचा एकात्मिक व सखोल अनुभव मिळण्याच्या उद्देशाने पदवीपूर्व (अंडरग्रॅज्युएट) स्तरावरील व्यापक स्वरूपाचे उदारमतवादी कलाशिक्षण अंमलात आणण्यात येईल. यामध्ये कल्पनाविलासी व लवचिक अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासाचे कल्पक संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकीकरण आणि बहुविध प्रवेश/प्रस्थान बिंदू (एंट्री/एक्झिटपॉईंट्स) असतील.

इ. अनुशासन: संस्थांचे अनुशासन शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक स्वायत्ततेवर आधारित असेल. प्रत्येक उच्चशिक्षण संस्था एका स्वतंत्र मंडळाकडून प्रशासित असेल.

ई. विनियमन: आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी संस्थांचे विनियमन 'सुटसुटीत पण कडक' पद्धतीचेअसेल आणि स्वारस्यसंघर्ष टाळण्याहेतू जनहितार्थ उद्देशाने करावयाची शाळांची प्रमाणित उभारणी,वित्तपुरवठा, प्रमाणन (ऍक्रेडिटेशन) व विनियमन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल.

३. शिक्षक शिक्षण

शिक्षक सजता कार्यक्रम अतिशय कसून घेण्यात येतील आणि सदर कार्यक्रम चैतन्यमय, बहुविध शाखांनी सुसज्जअसलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येतील. बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या या उच्च शिक्षणसंस्थांमध्ये स्तरानुसार, विषयवार राबविण्यात येणारा व एकीकरण केलेला ४ वर्षांचा 'बॅचलर ऑफ एज्युकेशन'हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादित करणे, हा शिक्षक होण्याचा प्रमुख मार्ग असेल, दुय्यम दर्जाच्या व अकार्यक्षम शिक्षक शिक्षण संस्था बंद करण्यात येतील,

४. पेशाविषयक शिक्षण

सर्व प्रकारचे पेशाविषयक/व्यावसायिक शिक्षण उच्च शिक्षण प्रणालीचा अविभाज्य घटक असेल, स्वतंत्र तांत्रिकविद्यापीठे, आरोग्यशास्त्र विद्यापीठे, विधी व कृषी विद्यापीठे किंवा या क्षेत्रातील किंवा तत्सम इतर क्षेत्रांतील संस्था बंद करण्यात येतील.

५. व्यावसायिक शिक्षण

व्यावसायिक शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असेल. सन २०२५ पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान ५०% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

६. नॅशनल रिसर्च फाऊंडेशन

संपूर्ण देशभर संशोधन व नवकल्पना या गोष्टींचा प्रसार वेगाने व्हावा, या हेतूने नवीन संस्थेची स्थापना करण्यात येईल.

७. शिक्षणामध्ये तंत्रज्ञान

वर्गातील शिक्षण प्रक्रिया सुधारण्यासाठी, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास साहाय्य करण्यासाठी, वंचितगटांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी आणि शैक्षणिक नियोजन, प्रशासन व व्यवस्थापन सुसूत्रबद्ध करण्यासाठी शिक्षणाच्या सर्वच स्तरांवर योग्य पद्धतीने तंत्रज्ञान समाविष्ट करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

८. प्रौढ शिक्षण

युवकांमध्ये व प्रौढांमध्ये १००% साक्षरता साध्य करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

९. भारतीय भाषांना चालना

हे धोरण सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, वृद्धी व चैतन्य अबाधित राहील, हे सुनिश्चित करेल.

१०. शिक्षणासाठी वित्तपुरवठा

सार्वजनिक शिक्षणाचा विस्तार व पुनरुज्जीवन करण्यास्तव मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रातून गुंतवणूक करण्यात येईल.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशनची स्थापना करण्यात येईल. हा आयोग भारतातील शैक्षणिक दूरदृष्टीचा परिरक्षक (कस्टोडियन) असेल.

संदर्भ - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

                                                                  क्रमशः



Sunday, April 19, 2020

बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.




           
               बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.
                                     
                                     प्रा. डॉ. राम ढगे,
                                     कर्जत.
                                      ९४०४९७९०९२.
आधुनिक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा सर्वमान्य व सर्वश्रुत असा आविष्कार म्हणजे मोबाईल. इंग्रजांनी संपर्क व संभाषणासाठी इसवी सन १८८२ मध्ये भारतात दूरध्वनी सेवा सुरू केली. पुढे हा दूरध्वनी इंग्रज अधिकारी, कार्यालये याबरोबरच भारतातील तत्कालीन श्रीमंत लोकांकडे उपलब्ध झाला. अगदी १९९० - २००० च्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापर्यंत हा दूरध्वनी सामान्य माणसांच्या घरात पोहचू शकला नाही. दरम्यानच्या काळात भारतात मोबाईलचे युग सुरू झाले होते. इसवी सन २००० च्या दशकात मोबाईल युगाची क्रांती सुरू झाली, आणि अवघ्या वीस वर्षात भारतातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, कामगार, मजूर यांच्यापर्यंत आधुनिक संप्रेषणाची सुविधा अल्प खर्चात मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाली . सध्या माणसांच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईल या नवीन गरजेचा समावेश करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सेवा व सुविधांमुळे आणि त्याच्या वापराच्या नित्य सवयींमुळे माणूस मोबाईल शिवाय काही क्षण सुद्धा राहू शकत नाही. एक तर हातात किंवा खिशात मोबाईल नसेल तर माणूस अक्षरशः अस्वस्थ होतो. मोबाईल हा गॅझेट प्रमाणे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जात आहे.  माणसाला खीळ ठेवणाऱ्या अनेक सुविधा वापरल्या जातात, उदाहरणार्थ सोशल मीडिया, विविध गेम्स, व्यवसाय किंवा नोकरीसाठी आवश्यक ॲप्स, शिक्षण रोजगार यासाठीचे ॲप्स, मनोरंजनासाठीचे ॲप्स, त्याचप्रमाणे स्वतःची मते व  विचार प्रसारित करता येणारी समाज प्रसारमाध्यमे अशा अनेक सुविधांमुळे माणूस सध्या मोबाईलचा जणूकाही व्यसनी झालेला दिसतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक लहान मुले. तरुण, प्रौढ व्यक्ती घराबाहेर पडुन मैदानी खेळ खेळणे खेळण्याऐवजी जणूकाही मोबाईल लॉक डाऊन झाले आहेत. त्यांनी स्वतःच स्वतःला लॉक डाऊन करून घेतलेले आहे.                             सध्या कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे जगातील मानव जातीचे अतीव नुकसान होत आहे.जगाची प्रगती खंडित झाली, सर्व अर्थव्यवस्था स्थगित झाली तसेच मानवी जातीची असुरक्षितता वाढली आहे. या काळात जगातील सर्व देशांच्या शासनाने लॉक डाऊन व संचार बंदीचे आदेश दिले आहेत. जगातील प्रचंड लोकसंख्या आहे तेथेच थांबली आहे. अशा भयावह काळात माणसाला सध्या मोबाईल चांगली साथ देत आहे. फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गजन्य रोगाविषयी जागृती होत आहे. शासनाने काढलेले वेगवेगळे आदेश अल्पकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी खूप मदत होत आहे. कोरोना संकट काळात अनेक तरुण फेसबुकवर विविध मोहिमा चालवत आहेत. जस की बार्शीतील एक युवक कोरोना विरोधात फेसबुक लाईव्ह वरून we will win मोहीम राबवित आहे.  यामुळे संकट काळातही जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत आहे. मोबाईलचा वापर चांगला की वाईट याविषयी चर्चा करण्याऐवजी सर्व जगाला लॉक डाऊन मध्ये आहे तेथेच थांबून खिळवून ठेवण्याची ताकद असणाऱ्या व आधुनिक काळातील जागृतीचे उत्तम साधन म्हणून मोबाईलचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. म्हणूनच सध्या असे वाटते , बरे झाले देवा! मोबाईलचा शोध लावला.

Friday, March 20, 2020

SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न - योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे


SSC बोर्ड परीक्षा 2023 साठी भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरा सह -
योग्य- अयोग्य व भौगोलिक कारणे



प्रश्न-  खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.

(१) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
उत्तर- योग्य

(२) भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-
भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे.

(३) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी
आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा
जास्त आहे.

(४) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
उत्तर- योग्य

(५) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा
लाभला आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान- ब्राझील देशाला अटलांटीक महासागराचा किनारा लाभला आहे.

(६) भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे.

(७) भारताच्या दक्षिण भूभागास द्विपकल्प म्हणतात.
उत्तर- योग्य

(८) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा
परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
उत्तर- योग्य

(९) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान
ऋतू असतात.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असुु शकत नाहीत.

(१०) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
उत्तर- योग्य

(११) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या
प्रमाणात पाऊस पडतो.
उत्तर- अयोग्य
दुरुस्त विधान-.ब्राझील देशात आग्नेय ईशान्यदिशेकडून येणाऱ्या  पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.



प्रश्न- पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा.


(१) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
उत्तर : 
(१) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत
वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीदवारे अडवले जातात.
(२) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत
जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व बाझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते.
(३) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य
पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो..

(२) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
उत्तर : 
 (१) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय
वाऱ्यांमळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखादया देशातीलसमुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.
(२) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण
कटिबंधात आहे.
(३) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही..

(३) ब्राझीलमध्ये कृमी-कीटकांची संख्या जास्त आहे
उत्तर : 
(१) कृमी व कोटक है प्रामुख्यान घनदाट वनांन प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
(२) झाडांची पाने, गवत, फुलांमधील रस इत्यादी कृमी वर
खादय असते.
(३) ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावने, पॅराग्वे.
नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशांत गवताळ प्रदेश आणि पटना
दलदलीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी-कीट
संख्या जास्त आहे.

(४) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
उत्तर : 
 (१) भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(३) भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्यावाढत आहेत. भारतात 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

(५) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे.
उत्तर : 

(१) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे
प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
(२) भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतातल्या 'झूम'सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणेच ब्राझीलमध्ये ‘रोका' या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे.
(३) या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

(६) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
उत्तर : 
 (१) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेकवसाहतवादयांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.
(२) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.
(३) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उदयोगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

(७) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
उत्तर : 
 (१) शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा
प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
(२) या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.'
(३) या शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.'

(८) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
उत्तर : 
(१) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या
पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.
(२) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
(३) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

(९) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय
भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
(२) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
(३) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय
कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे.


(१०) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
उत्तर : 
 (१) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस
किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७,२६३ चौरस किमी आहे.
(२) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट,भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.
(३) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व
लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

(११) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
उत्तर : 
 (१) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे
सह-अस्तित्व असते.
(२) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उदयोग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे.
(३) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य,
शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.


(१२) ब्राझीलमध्ये (अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.
उत्तर : 
(१) ब्राझीलमधील बहुतांश नदयांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे.
(२)ब्राझीलमधील बहतांश नदयांतील विसर्गाचा वेग जास्त आहे.
(३) ब्राझीलमधील नदयांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंचसखल भूभाग आहेत. त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणन
(अंतर्गत) जलमार्गाचा विकास झालेला नाही.

(१३) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.
उत्तर : 
(१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या
प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते.
(२) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उदयोग भरभरातीस आले आहेत.
(३) या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे.

(१४) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.
उत्तर : 
(१) वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहना
दसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते.
(२) वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांस चालना मिळते.
(३) वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व
आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो.

(१५) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
उत्तर : 
 (१) जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे.
त्याचप्रमाणे, जलवाहतुकीत वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते.
(२) आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात
निर्यात केली जाते.
(३) आतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा वापर केला असता कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची आयात व निर्यात करता येते म्हणून, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.


SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे सराव वस्तुनिष्ठ प्रश्न जोड्या, वेगळा घटक,अचूक पर्याय


 SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह-

 (जोड्या,वेगळा घटक आणि अचूक पर्याय)






प्रश्न- जोड्या जुळवा
प्रश्न- वेगळा घटक ओळखा.
प्रश्न . अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

प्रश्न- जोड्या जुळवा :

'अ' गट                                 'ब' गट
(१) सदाहरित वने               (अ) सुंद्री
(२) पानझडी वने                (ब) पाइन
(३) समुद्राकाठची वने          (क) पाव ब्राझील
(४) हिमालयीन वने              (ड) खेजडी
(५) काटेरी व झुडपी वने       (ई) साग
                                       (फ) आमर
                                        (ग) साल
उत्तर- (१)- क (२)-इ (३)-अ (४)-ब (५)-ड

'अ' गट                                 'ब' गट
(१) ट्रान्स अॅमेझॉलियन मार्ग    (अ) पर्यटन स्थळ
(२) रस्ते वाहतूक                   (ब) भारतातील रेल्वे स्थानक
(३) रिओ दी जनेरिओ            (क) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(४) मनमाड                         (ड) प्रमुख रस्ते मार्ग
                                         (ई) ४०° पश्चिम रेखावृत्त
उत्तर- (१)- ड (२)-क  (३)-इ (४)-ब 


 प्रश्न- वेगळा घटक ओळखा.

(१) ब्राझीलमधील वनप्रकार.
(अ)काटेरी झुडपी वने
(ब) सदाहरित वने
(क) हिमालयीन वने
(ड) पानझडी वने

(२) भारताच्या संदर्भात -
अ) खारफुटीची वने
(ब) भूमध्य सागरी वने
(क) काटेरी झुडपी वने
(ड) विषुववृत्तीय वने

(३) ब्राझीलमधील वन्य प्राणी.
 (अ) अॅनाकोंडा
 (ब) तामिर
 (क) लाल पांडा
 (ड) सिंह

(४) भारतीय वनस्पती.
(अ) देवदार
(ब) अंजन
(क) ऑर्किड
(ड) वड.

(५) हिमालयातील वनांतील वृक्ष.
(अ) पाईन
(ब) पिंपळ
(क) देवदार
(ड) फर.

उत्तरे : (१)-(क); (२)-(ड); (३)-(क); (४)-(क);
(५)-(ब).

प्र.२ अचूक गट ओळखा:

(१) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
(अ) पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी
(ब) गियाना उच्चभूमी - अॅमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी
(क) किनारपट्टीचा प्रदेश – ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी

(२) ब्राझीलच्या या नदया उत्तरवाहिनी आहेत.
(अ) जुरुका - झिंगू – अरागुआ
(ब) निग्रो - ब्रांका – पारु
(क) जापूआ – जारुआ – पुरूस

 (३) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात.
(अ) कर्नाटक – महाराष्ट्र – बुंदेलखंड
(ब) छोटा नागपूर – माळवा – मारवाड
(क) तेलंगणा – महाराष्ट्र - मारवाड

(४) भारतातील पुढील राज्यांत प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो.
(अ) हिमाचल प्रदेश – मध्य प्रदेश – आसाम
(ब) जम्मू आणि काश्मीर – उत्तराखंड – महाराष्ट्र
(क) तेलंगणा – महाराष्ट्र – कर्नाटक

(५) ब्राझीलमधील पुढील राज्यांत गियाना उच्चभूमी विस्तारलेली आढळते.
(अ) पारा -पाराना – बाहिया
(ब) रोराइमा – पारा - सांता
(क) आमापा – सांता - सियारा

उत्तरे : (१)-(ब); (२)-(अ); (३)-(अ); (४)-(क);
(५)-(ब).

प्रश्न 3. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.

(१) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ..

(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.

(२) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा-----

(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नदया आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.

(३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ......

(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.

(४) अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या
नदीच्या मुखालगत......

(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही.
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.

(५) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही......

(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली
आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.

(६) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ...

(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.

उत्तरे : (१)-(i); (२)-(ii); (३)-(iii); (४)-(ii);
(५)-(ii);(६)-(iii).

SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न रिकाम्या जागा


SSC बोर्ड परीक्षा 2023 भूगोल विषयाचे महत्वाचे वस्तुनिष्ठ सराव प्रश्न उत्तरासह (रिकाम्या जागा)


प्रश्न . कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा व पुन्हा लिहा.

(1) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ........ नावाने
ओळखले जाते.
(i) लक्षद्वीप
(ii) कन्याकुमारी
(iii) इंदिरा पॉईंट
 (iv) पोर्ट ब्लेअर
उत्तर-  (iii) इंदिरा पॉईंट

(2) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या
सीमेलगत नाहीत.
(i) चिली-इक्वेडोर
(ii) अर्जेंटिना-बोलिव्हिया
(iii) कोलंबिया-फ्रेंच गियाना
(iv) सुरीनाम-उरुग्वे
उत्तर-  (i) चिली-इक्वेडोर

(3) भारत व ब्राझील या दोन्ही देशांतील राजवट ........... प्रकारची आहे.
 (i) लष्करी
 (ii) साम्यवादी
 (iii) प्रजासत्ताक
 (iv) अध्यक्षीय
उत्तर- (iii) प्रजासत्ताक

(४) भारताची जास्तीत जास्त भू-सीमा ----------- या
संलग्न आहे.
 (बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ)
उत्तर- बांग्लादेश

(५)-------- ही भारताची राजधानी आहे.
(यानम, नवी दिल्ली , दीव, चंदीगढ)
उत्तर- नवी दिल्ली

(६)--------ही ब्राझीलची राजधानी आहे.
(बाहिया, ब्राझीलिया, रोन्डोनिया, रोराईमा)
उत्तर- ब्राझीलिया

(७) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे.
कारण--------
(कमी राष्ट्रीय उत्पन्न, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य
कमतरता)
उत्तर- प्रचंड लोकसंख्या

(८) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने---------
व्यवसायावर अवलंबून आहे.
(प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक)
उत्तर- तुतीयक

(९) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही
-------- प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
(अविकसित, विकसित, विकसनशील, अतिविकसित)
उत्तर- विकसनशील

(१०) भारतात ----------- राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(गुजरात, गोवा, पंजाब, पश्चिम बंगाल)
उत्तर- गुजरात

(११) ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर -- -------- निर्यात
केली जाते.
(खतांची, वाहनांची, कॉफीची, यंत्रांची)
उत्तर- कॉफीची

(१२) ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी............ सर्वाधिक वापर केला जातो.
(अ) जलमार्गांचा
(ब) रस्ते मार्गांचा
(क) लोहमार्गांचा
(ड) हवाई मार्गांचा
उत्तर- रस्ते मार्गांचा

(१३) भारताच्या आर्थिक विकासास....... मोठ्या प्रमाणावर
चालना दिली आहे.
(अ) जलमार्गांनी
(ब) हवाई मार्गांनी
(क) रस्ते मार्गांनी
(ड) लोहमार्गांनी
उत्तर- लोहमार्गांनी

(१४) भारतातील--------राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे
आढळते.
(अ) उत्तर प्रदेश
(ब) महाराष्ट्र
(क) मध्य प्रदेश
 (ड) राजस्थान
उत्तर- राज्यस्थान

(१५) ब्राझीलमध्ये ------------- भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे.
 (अ) दक्षिण
 (ब) मध्य
 (क) पूर्व
 (ड) वायव्य
उत्तर- वायव्य

(१६) ब्राझीलमध्ये एकूण ------------- प्रमाणवेळा मानल्या जातात.
 (अ) दोन
 (ब) तीन
 (क) चार
 (ड) पाच
उत्तर- चार

Thursday, February 27, 2020

S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (संकल्पना व टिपा)



S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव  प्रश्न उत्तरासह (संकल्पना व टिपा)


S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह  (संकल्पना व टीपा)




प्रश्न- पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१) हक्काधारित दृष्टीकोन

उत्तर---
 स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, ही शासन पद्धती देशात रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी प्रत्येक शासनाने प्रयत्न केले,

          सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला सत्तेवर आलेल्या सरकारांचा दृष्टिकोन होता, मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन सुधारणा होऊ लागल्या.

         प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टीकोन असे म्हणतात.

२) माहितीचा अधिकार

उत्तर---
                                                 शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला.

               गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे जनतेच्या समोर येतात, शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेचे उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.

              माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले.


३) प्रादेशिकता
उत्तर---

                                       भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.
              तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर भौगोलिक विविधता आहे, त्यामुळे प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते या  आत्मीयतेतून अस्मिता निर्माण होते. आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात यालाच प्रादेशिकता असे म्हणतात.

४) राष्ट्रीय पक्ष

उत्तर---
                                         राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेली आहेत.

 १. किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळणे किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा

२. आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा निवडून येणे आवश्यक किंवा

३. किमान चार राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

टिपा लिहा.

१) अल्पसंख्यांक विषयक तरतुदी-
उत्तर---                                                                               धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

                   अल्पसंख्यांकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.

                   अल्पसंख्यांकांची भाषा-संस्कृती लिपी धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात विविध तरतुदी करण्यात आलेले आहेत.

२) राखीव जागा विषयक धोरण
उत्तर---                                                                                 भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्ष सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी न पासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत.

                अशा लोक समूहांना स्वातंत्र्यानंतर मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते, म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याची धोरण स्वीकारले.

                 पुढे संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली. राखीव जागा विषयक धोरणामुळे वंचित समाज घटकांना न्याय मिळवून आपला विकास करण्याची संधी मिळाली.

३) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व-
उत्तर---
                                                                                      संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारले.

              त्यामुळे 1952 च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. आता ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

              लोकसभेच्या एकूण जागेच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या सभागृहात मांडले गेले आहे.

               स्त्रियांच्या लोकसभेतील प्रतीनिधित्वात वाढ झाल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.

४) मतदारसंघांची पुनर्रचना
उत्तर---
                                                                    विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदार संघ तयार करण्याचे काम निवडणूक आयोगाची असते.

                  निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले ,परंतु खेड्यातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते त्यामुळे मतदार संघ संतुलित राहत नाहीत.

                    म्हणून मतदारसंघांची पुनर्र्चना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते.

५) मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास

उत्तर-                                                                                               1951- 52 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेटी यांचा वापर केला जात असे.

             1998 साली पहिल्यांदा मध्यप्रदेश मधील 5, राजस्थानातील पाच व दिल्लीतील सहा अशा सोळा  विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा (ईव्हीएम) वापर केला गेला.

             2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम चा नियमित वापर सुरू झाला. ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची मतदान पडताळणी पावती मिळते.

६) आदिवासी चळवळ
उत्तर---

                                                    आदिवासी समाज जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे, ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीच्या अधिकारावर गदा आणल्याने आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले होते.

                       स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाची प्रश्न सुटलेले नाहीत. वन जमिनीवरील त्यांचे हक्क, वनातील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने चालू आहेत.

७) कामगार चळवळ

उत्तर---

                                                 १८५० नंतर भारतात कापड गिरणी, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. औद्योगिकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला.

                   पुढे त्यांच्या समस्या वाढल्या या समस्या सोडविण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या.

                 स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक संघटना स्थापन झाल्या.

जागतिकीकरणात आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे.

बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा २०२६ साठी आदर्श नमुना उत्तरपत्रिका १

आदर्श नमुना उत्तरपत्रिका Model Anser Sheet रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. सराव परीक्षा उत्तरपत्रिका क्र...