Thursday, July 7, 2022

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध भाषांमध्ये पाठ्यपुराक व पूरक साहित्य तयार करत आहे. सध्या संपूर्ण भारतात नवीन राष्ट्रीय धोरण 2020 राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा विषय समित्यांचे गठन करणे शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे यासाठी भाषा व विषय समित्यावर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकातील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची निवड करण्यासाठी सदर लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जाहिरात क्रमांक: 1029 
दिनांक 1/7/ 2022
लिंक भरण्याचा कालावधी दिनांक 4/7/2022 ते 20/7/2022 रात्री 12:00 वाजेपर्यंत

अर्ज करण्यासाठी निळ्या रंगाच्या लिंक वरती क्लिक करा.
👇👇👇👇👇👇




Sunday, January 30, 2022

बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका 2





 रयत शिक्षण संस्थेचे,

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.

सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक २: २०२५

विषय - राज्यशास्त्र

इयत्ता - बारावी    वेळ - ३ तास             गुण – ८०

---------------------------------------------------------------------

प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.(५)                                                                        

१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.

( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.

( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)

३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.

(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)

४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.

(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.     (३)                          

(१) अ) NATO - युरोप

 ब) ANZUS - आफ्रिका

 क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया

 ड) CENTO - पश्चिम आशिया

(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India

      ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE

      क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०

      ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती

(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन

      ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन

      क) पारदर्शकता-  आधुनिक प्रशासन.

      ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन

प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.   (४)                             

१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

   (अ) अमेरिका

   (ब) युनायटेड किंग्डम

   (क) स्वीडन 

   (ड) रशिया

२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-

(अ) पंचायती राज

(ब) राष्ट्रीय एकात्मता

(क) राष्ट्र ही संकल्पना

(ड) Melting Pot ही संकल्पना

३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.

(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन 

(ब) शीतयुद्धात सहभाग 

(क) लोकशाही समाजवाद एक धोरण

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.

(अ) बांगलादेश 

(ब) पाकिस्तान

(क) चीन 

(ड) नेपाळ

प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा.     (४)                                          

१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-

२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -

३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -

४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -

प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.                     (४)                                                      

१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन

२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद 

३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी

४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड

प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.         (४)           


                                              

प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.      (५)          

१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा.           (२)                                         

२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे  सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा.   (२)                

३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)



प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच)         (१०)                                      

१) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.

२) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.

३) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.

४) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.

५) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.

६) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.

७) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

प्रश्न ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन)                    (९)                                             

१) जागतिकीकरण आणि संस्कृती.

२) गरीबी आणि विकास.

३) राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता.

४) सुशासन आणि ई- प्रशासन.

५)  पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे परराष्ट्र धोरण.

प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन).     (१२)                                        

१) आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद.

२) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज.

३) शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.

४) हिंदी महासागरात भारताची भूमिका.

५) ई - प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली.


प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन)                          (१०)                                      

१) सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा.

२) जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणते आहेत.

३) सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा.

४) जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा.

प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा.         (१०)

१) भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.

  अ) भौगोलिक घटक              ब) ऐतिहासिक घटक                 क) आर्थिक घटक                ड) राजकीय घटक                     ई) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

२) जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रात घडून आलेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

  अ) लोकशाहीचे महत्त्व        ब) राज्याचे स्थान       

  क) बिगर राजकीय घटक         ड) मानवी हक्क






बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका 3

  
रयत शिक्षण संस्थेचे,
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा.
सराव परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक ३
विषय - राज्यशास्त्र
इयत्ता - बारावी       वेळ - 3.00 तास      गुण – ८०
-----------------------------------------------------------------------------
प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)                                        
१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली
(१९९०, १९८५, १९९५, १९९९)
२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.
( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)
३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.
(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)
४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.
(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)
५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.
(२००२,२००७,२००५,२०००) 
प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)                                
(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७
      ब) बांडुंग परिषद - १९५५
      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०
      ड) बेलग्रेड परिषद - १९६१
(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती
     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल
     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा
     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली
(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो
      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC
      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल
      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)                                        
१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------
(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.
(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.
(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 
(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.
२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----
(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.
(ब) महिला सक्षमीकरणासाठी.
(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.
(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.
३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण-----
(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.
(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.
(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.
(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण
४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----
(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 
(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.
(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 
(ड) महागाई कमी झाली.

प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)                                 
१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-
२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -
३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-
४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                            
१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.
२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 
३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन
४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

प्रश्न २. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. (४)                                    


प्रश्न २. ब) खालील नकाशा चे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (५)                                       
१) हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                             
२) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                  
३) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत नसणाऱ्या कोणत्याही एका देशाचे नावे लिहा. (१)                                                  

प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                                           
१) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.
२) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.
३) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.
४) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.
५) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.
६) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.
७) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

 ४) खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. (कोणतीही तीन) (९)                                           
१) हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर.
२) भारतीय संस्कृती आणि प्रसार माध्यमे.
३) लिंगभाव समानता आणि स्त्रियांवर होणारे अन्याय.
४) राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.
५) अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान - बहुध्रुवियव्यवस्थेचा उदय.

प्रश्न ५) खालील विषयांवर तुमचे मत २५ ते ३० शब्दात मांडा. (कोणतेही तीन). (१२)                                   
१) आधुनिक दहशतवाद.
२) जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात.
३) पर्यावरण रहसातून अनेक समस्या उद्भवतील.
४) राष्ट्रीय एकात्मता घडवून आणण्यात राज्याची भूमिका महत्त्वाची असते.
५) भारत ही एक उगवती सत्ता आहे.

प्रश्न ६) खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० लिहा. (कोणतेही दोन) (१०)                                            
१) युरोपियन संघाचे विवरण करा.
२) ट्रान्स नॅशनल कंपनी म्हणजे? काय ट्रान्स नॅशनल कंपनी यांच्या उदयाचे सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम झाले आहेत?
३) भारत-अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घ्या.
४) दारिद्र्य विषयक पारंपरिक दृष्टिकोन विशद करा.

प्रश्न ७) खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे १५० ते २०० शब्दांत लिहा. (१०)
१) भारतातील महिलांची स्थिती.
 अ) आर्थिक असमानता ब) तस्करी व शोषण                 
 क) साक्षरतेचे प्रमाण ड) राजकीय प्रतिनिधित्व  

२) स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतासमोर उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा घ्या.
अ) आर्थिक समस्या ब) देशी संस्थानांचे विलीनीकरण क) भारत-पाकिस्तान संघर्ष    
 ड) पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे सामीलीकरण ई) फुटीरतावादी चळवळी

समाप्त

Monday, January 24, 2022

राष्ट्रीय मतदार दिवस - डॉ. राम ढगे.

                     राष्ट्रीय मतदार दिवस

      मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!
                                              डॉ.राम ढगे,
                                    महाराजा जिवाजीराव शिंदे,
                                         महाविद्यालय श्रीगोंदा.
आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जगातील सर्वात मोठ्या लोकशाही जनतेला मतदार दिवसाच्या शुभेच्छा.
भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून स्वातंत्र्य प्राप्त झाले. भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही पर्वाला सुरुवात झाली. 26 जानेवारी या दिवशी भारत लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्याने गौरव केला जातो. त्या लोकशाहीत महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार होय. पारदर्शक निवडणुका या लोकशाहीचा पाया समजल्या जातात. निवडणुकीतील मतदान हा नागरिकांसाठी असलेला मूलभूत अधिकार आहे. ज्या अधिकाराद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला राजकीय हक्क प्राप्त झालेला आहे. भारतात होणारी प्रत्येक निवडणूक निकोप,पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. भारतातील साक्षरतेचे प्रमाण वाढूनही दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी टक्केवारी या बाबीचा विचार करता भारतीय लोकशाहीत लोकांचा म्हणजेच मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी सन 2011 पासून भारत सरकारने निवडणूक आयोगाचा स्थापनादिन म्हणजेच 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यास सुरुवात केली.
भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, देशाच्या राजकीय प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व मतदारांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी शासनाकडून व विविध सामाजिक संस्थांकडून राष्ट्रीय मतदार दिनादिवशी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ मतदार जनजागृती रॅली, नवमतदारांची नोंदणी, लोकनृत्य, नाटक, संगीत, चित्रकला स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळेच खरे प्रतिनिधित्व पुढे येऊ शकते. तसेच एक मत सुद्धा प्रतिनिधित्व बदलू शकते. मतदार दिनानिमित्त देशातील सर्व मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, भारत हा युवकांचा देश आहे, अधिकाधिक युवक मतदारांना राजकीय प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो.
भारतीय लोकशाहीला बळकट बनवण्यासाठी भारतीय लोकशाहीत सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे लोकसहभागाची! परंतु दुर्दैवानं अनेकांना असं वाटतं की जनता आणि लोकप्रतिनिधी हे दोन परस्परांपेक्षा भिन्न आणि संपूर्णतः स्वतंत्र असे घटक आहेत. वास्तवात लोकशाहीच काय, पण कोणतीही राज्यपद्धती ही नागरिकांच्या सहभागाशिवाय चालू शकत नाही. हा सहभाग निव्वळ मत देणं आणि आपलं मत व्यक्त करणं एवढ्यापुरता मर्यादित नाही. तर स्थानिक प्रतिनिधीकडे महत्त्वाचे प्रश्न नेण्यापासून ते प्रसंगी राज्य, केंद्र शासन निर्णयाविरुद्ध आंदोलनात सहभागी होण्यापर्यंत आपल्या सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत नियमित सामील व्हायला हवं. लोकशाहीत सामील होण्यासाठी आजच्या पिढीला वरदान मिळाले आहे, ते म्हणजे आधुनिक प्रसार आणि संपर्क माध्यमे होय. आजची तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसते. भारताच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी सोशल मीडियावर सकारात्मक दृष्टिकोनातून तरुणाईने सहभागी होऊन आपला सक्रिय राजकीय सहभाग वाढविणे आवश्यक आहे. तसेच मतदान एक राजकीय अधिकार असला तरी मतदानाविषयी नागरिकांमध्ये कर्तव्याची जाण निर्माण करणे, हे राष्ट्रीय कार्य म्हणून तरुण पिढीने पार पाडणे अपेक्षित आहे.
 चला तर आजच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाही शासन प्रक्रियेत सक्रिय सहभागाची शपथ घेऊ आणि भारतीय लोकशाहीला बळकट बनवू.

Wednesday, November 25, 2020

जागर भारतीय संविधानाचा- डॉ. राम ढगे.

                
              "जागर भारतीय संविधानाचा" 
                                       डॉ. राम ढगे.


           15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश साम्राज्यसत्तेविरूद्ध प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याची सांगता झाली. आणि भारतामध्ये परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले.भारत एक स्वतंत्र सार्वभौम राज्य बनले. स्वतंत्रता,सार्वभौमत्व प्राप्त झाल्याने उदयन्मुख भारताचे सर्व प्रश्न सुटले नव्हते.एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपले स्वातंत्र्य टिकविण्याचे आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करण्याचे कार्य भारताला करायचे होते. त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्त्वांवर आधारलेली लोकशाही निर्माण करण्याचे कार्य करायचे होते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्राची उभारणी कोणत्या तत्त्वावर करायची यासंबंधीच्या कल्पना स्वातंत्र्यलढ्याच्या काळातच स्वीकारण्यात आलेल्या होत्या.या कल्पना व ब्रिटिश सरकारच्या मदतीने भारताची राज्यघटना निर्माण करणे हा त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी केलेला प्रयत्न आहे.स्वतंत्र भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली.आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 पासून भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासन पद्धतीचा स्वीकार करून एका नव्या युगात प्रवेश केला. कोणत्याही लहान मोठ्या संस्थेचे कार्य सुरळीतपणे व विकासाच्या दिशेने चालावयाचे असेल तर त्या संस्थेला विशिष्ट नियमांची आवश्यकता असते.विशिष्ट नियमांमुळे संस्थेची उद्दिष्टे निश्चित काळात पूर्ण होऊ शकतात. अगदी या उदाहरणाप्रमाणेच एखाद्या राज्याचा राज्यकारभार सुरळीतपणे व विकासाच्या दिशेने चालवायचा असेल तर त्या राज्यांमध्ये नियमांची आवश्यकता असते.असेही म्हटले जाते की,राज्याचा राज्यकारभार एका विशिष्ट आणि सर्वमान्य नियमानुसार चालला तर राज्यातील लोकांचे जीवन सुखी आणि समाधानी होते. राज्याच्या कारभारासाठी तयार केलेल्या नियमांच्या किंवा कायद्यांच्या संचाला राज्यघटना असे म्हणतात. कोणत्याही राज्याची राज्यघटना ही त्या देशाचा इतिहास, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती,लोकांच्या आकांक्षा, राजकीय नेत्यांचे दृष्टीकोन अशा घटकांच्या एकत्रित परिणामातून निर्माण होत असते.भारतीय राज्यघटनाही त्याला अपवाद नाही.भारतीय स्वातंत्र्य चळवळ,स्वातंत्र्य चळवळीतील राजकीय नेत्यांचे दृष्टीकोन आणि पारतंत्र्यात पिचलेल्या जनतेच्या अपेक्षामधून भारतीय राज्यघटनेची निर्मिती झालेली आहे. भारतीय राज्यघटनेत राज्याची उद्दिष्टे,नागरिकांचे हक्क,शासनाच्या विविध अंगाची रचना,त्यांचे अधिकार व त्यांच्यातील परस्परसंबंध या बाबींचा समावेश होतो. भारताची राज्यघटना केवळ शासन संस्थेचे रचना अधिकार सांगणारे नियम नव्हेत तर भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांनी लोकशाहीची प्रस्थापना सामाजिक आर्थिक परिवर्तन राष्ट्रीय एकात्मता ही तीन उद्दिष्टे समोर ठेवून निर्माण केलेली परिवर्तनाची एक नांदी आहे. लोकशाही,सामाजिक-आर्थिक विकास आणि राष्ट्राची एकात्मता या बाबी एकमेकांपासून अलग नाहीत. सामाजिक-आर्थिक विषमता आणि मागासलेपणा दूर होण्यासाठी लोकशाहीचा विकास झाला पाहिजे.आणि सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडून आले तरच राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल.म्हणून भारतीय राज्यघटनेत केलेल्या तरतुदी याच उद्देशाने केलेल्या आहेत.भारतीय राज्यघटनेचे वर्णन करताना ग्रँनव्हील ऑस्टिन या अभ्यासकाने भारतीय राज्यघटनेला राष्ट्राची आधारशीला असे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेतील तत्वे,उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे घटनाकरांना अपेक्षित होते. परंतु आपण आज पाहतो भारतीय राज्यघटनेबद्दल देशातील सर्व नागरिकांमध्ये म्हणावी तेवढी जागृती झालेली दिसून येत नाही. परिणामी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आजही प्रभावीपणे होताना दिसून येत नाही.यासाठी भारतीय संविधान,संविधानातील तत्वे,उद्दिष्टे देशातील जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक वाटते. यासाठीच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतातील अशिक्षित, गरीब, मागासलेल्या समाज घटकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचवणे ही समाजातील शिक्षित वर्गाची, राजकीय पक्षांची तसेच विविध समाजसेवी संघटनांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सर्व घटकांनी प्रभावीपणे पार पाडावी हीच संविधान दिनानिमित्त अपेक्षा आहे.

Wednesday, September 9, 2020

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

 

               राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

 

१. शालेय शिक्षण

अ. प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण: सदर धोरण प्रारंभिक वर्षांच्या महत्वावर भर देते आणि २०२५ सालापर्यंत ३ ते ६ वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्यावस्थेतील दर्जेदार निगा व शिक्षण दिले जात असल्याची दक्षता घेणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. याकरिता गुंतवणुकीमध्ये लाक्षणिक वाढ करून नवनवीन उपक्रम राबविण्याचाही या धोरणाच्या उद्दिष्टामध्ये समावेश आहे.

आ. पायाभूत साक्षरता व अंकज्ञान: इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रारंभिक भाषा व गणित यांच्याकडे विशेष ध्यान पुरविले जाईल. सन २०२५ पर्यंत इयत्ता पाचवी व त्यापुढील इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व अंकज्ञान आत्मसात होत असल्याची दक्षता घेणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

इ. अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र: शालेय शिक्षणासाठी ५+३+३+४ रचनेवर आधारित बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्त्वांवर आधारित एक अभिनव विकासात्मकदृष्ट्या योग्य अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र रचना विकसित करण्यात आली आहे. शाळांमध्ये विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, क्रीडा, गणित इ. सर्व विषयांवर समान भर देताना व्यावसायिक (पेशाविषयक) व शैक्षणिक शाखांचे एकीकरण करण्यात येईल.

ई. वैश्विक प्रवेश: सन २०३० पर्यंत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सर्व शालेय शिक्षणामध्ये १००% ग्रॉस एनरोलमेंट रेशो (म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांपैकी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर) आत्मसात करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

उ. न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षण: जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्याशी निगडित परिस्थितीमुळे कोणतेही मूल शिकण्याच्या व प्रगतीच्या एकाही संधीला मुकणार नाही, याची हमी देण्यासाठी या धोरणामध्ये अनेक नियोजित उपाययोजना अंतर्भूत आहेत. यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष शिक्षण झोनदेखील उभारण्यात येतील.

ऊ. शिक्षक: शिक्षकांची नेमणूक अतिशय सक्षम व पारदर्शक प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. शिक्षकांना गुणवत्तेच्या निकषांनुसार बढती देण्यात येईल. कामगिरीचे बहुस्रोतांवर आधारित नियमित मूल्यमापन करण्यात येईल आणि शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षकांचे शिक्षक होण्यासाठी श्रेणी प्रगमनाचे (प्रोग्रेशन) मार्ग उपलब्ध असतील.

ऋ. शालेय अनुशासन: शाळांची व्यवस्था व आयोजन शालेय संकुलांमध्ये (शालेय संकुल म्हणजे १०-२० शासकीय शाळांचा समूह) करण्यात येईल. अनुशासन व प्रशासन यांचे हे मूलभूत एकक असेल. याद्वारे सक्षम व्यावसायिक शिक्षक समुदायासोबतच पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), शैक्षणिक सुविधा (उदा.ग्रंथालये) व मनुष्यबळ (उदा. कला व संगीत शिक्षक) अशा सर्व प्रकारच्या साधनांची उपलब्धता होत असल्याची दक्षता घेता येईल.

ल. शालेय विनियमन: स्वारस्यसंघर्ष टाळण्याहेतू शाळांचे विनियमन व प्रचालन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल. धोरणनिर्मिती, विनियमन (रेग्युलेशन), प्रचालन (ऑपरेशन्स) व शैक्षणिक बाबींकरिता सुस्पष्ट व स्वतंत्र प्रणाली अस्तित्वात असतील.

२. उच्च शिक्षण

अ. नवीन संरचना (आर्किटेक्चर): विशाल, सर्वसाधनसमृद्ध, चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज संस्थांद्वारे उच्च शिक्षणासाठी नवीन दूरदृष्टी व संरचना (आर्किटेक्चर) परिकल्पित करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेली ८०० विद्यापीठे व ४०,००० महाविद्यालये सुमारे १५,००० उत्कृष्ट संस्थांमध्ये संकलित करण्यात येईल.

आ. उदारमतवादी शिक्षण: विज्ञान, कला, मानवतावाद, गणित व व्यावसायिक क्षेत्रांचा एकात्मिक व सखोल अनुभव मिळण्याच्या उद्देशाने पदवीपूर्व (अंडरग्रॅज्युएट) स्तरावरील व्यापक स्वरूपाचे उदारमतवादी कलाशिक्षण अंमलात आणण्यात येईल. यामध्ये कल्पनाविलासी व लवचिक अभ्यासक्रमाची रचना, अभ्यासाचे कल्पक संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकीकरण आणि बहुविध प्रवेश/प्रस्थान बिंदू (एंट्री/एक्झिटपॉईंट्स) असतील.

इ. अनुशासन: संस्थांचे अनुशासन शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक स्वायत्ततेवर आधारित असेल. प्रत्येक उच्चशिक्षण संस्था एका स्वतंत्र मंडळाकडून प्रशासित असेल.

ई. विनियमन: आर्थिक विश्वसनीयता साध्य करण्यासाठी संस्थांचे विनियमन 'सुटसुटीत पण कडक' पद्धतीचेअसेल आणि स्वारस्यसंघर्ष टाळण्याहेतू जनहितार्थ उद्देशाने करावयाची शाळांची प्रमाणित उभारणी,वित्तपुरवठा, प्रमाणन (ऍक्रेडिटेशन) व विनियमन स्वतंत्र समित्यांकरवी करण्यात येईल.

३. शिक्षक शिक्षण

शिक्षक सजता कार्यक्रम अतिशय कसून घेण्यात येतील आणि सदर कार्यक्रम चैतन्यमय, बहुविध शाखांनी सुसज्जअसलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येतील. बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या या उच्च शिक्षणसंस्थांमध्ये स्तरानुसार, विषयवार राबविण्यात येणारा व एकीकरण केलेला ४ वर्षांचा 'बॅचलर ऑफ एज्युकेशन'हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादित करणे, हा शिक्षक होण्याचा प्रमुख मार्ग असेल, दुय्यम दर्जाच्या व अकार्यक्षम शिक्षक शिक्षण संस्था बंद करण्यात येतील,

४. पेशाविषयक शिक्षण

सर्व प्रकारचे पेशाविषयक/व्यावसायिक शिक्षण उच्च शिक्षण प्रणालीचा अविभाज्य घटक असेल, स्वतंत्र तांत्रिकविद्यापीठे, आरोग्यशास्त्र विद्यापीठे, विधी व कृषी विद्यापीठे किंवा या क्षेत्रातील किंवा तत्सम इतर क्षेत्रांतील संस्था बंद करण्यात येतील.

५. व्यावसायिक शिक्षण

व्यावसायिक शिक्षण सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अविभाज्य घटक असेल. सन २०२५ पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान ५०% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ मिळावा, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

६. नॅशनल रिसर्च फाऊंडेशन

संपूर्ण देशभर संशोधन व नवकल्पना या गोष्टींचा प्रसार वेगाने व्हावा, या हेतूने नवीन संस्थेची स्थापना करण्यात येईल.

७. शिक्षणामध्ये तंत्रज्ञान

वर्गातील शिक्षण प्रक्रिया सुधारण्यासाठी, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास साहाय्य करण्यासाठी, वंचितगटांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी आणि शैक्षणिक नियोजन, प्रशासन व व्यवस्थापन सुसूत्रबद्ध करण्यासाठी शिक्षणाच्या सर्वच स्तरांवर योग्य पद्धतीने तंत्रज्ञान समाविष्ट करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

८. प्रौढ शिक्षण

युवकांमध्ये व प्रौढांमध्ये १००% साक्षरता साध्य करणे, हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

९. भारतीय भाषांना चालना

हे धोरण सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, वृद्धी व चैतन्य अबाधित राहील, हे सुनिश्चित करेल.

१०. शिक्षणासाठी वित्तपुरवठा

सार्वजनिक शिक्षणाचा विस्तार व पुनरुज्जीवन करण्यास्तव मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रातून गुंतवणूक करण्यात येईल.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशनची स्थापना करण्यात येईल. हा आयोग भारतातील शैक्षणिक दूरदृष्टीचा परिरक्षक (कस्टोडियन) असेल.

संदर्भ - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019

                                                                  क्रमशः



Sunday, April 19, 2020

बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.




           
               बर झालं देवा! मोबाईलचा शोध लावला.
                                     
                                     प्रा. डॉ. राम ढगे,
                                     कर्जत.
                                      ९४०४९७९०९२.
आधुनिक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा सर्वमान्य व सर्वश्रुत असा आविष्कार म्हणजे मोबाईल. इंग्रजांनी संपर्क व संभाषणासाठी इसवी सन १८८२ मध्ये भारतात दूरध्वनी सेवा सुरू केली. पुढे हा दूरध्वनी इंग्रज अधिकारी, कार्यालये याबरोबरच भारतातील तत्कालीन श्रीमंत लोकांकडे उपलब्ध झाला. अगदी १९९० - २००० च्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षापर्यंत हा दूरध्वनी सामान्य माणसांच्या घरात पोहचू शकला नाही. दरम्यानच्या काळात भारतात मोबाईलचे युग सुरू झाले होते. इसवी सन २००० च्या दशकात मोबाईल युगाची क्रांती सुरू झाली, आणि अवघ्या वीस वर्षात भारतातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, कामगार, मजूर यांच्यापर्यंत आधुनिक संप्रेषणाची सुविधा अल्प खर्चात मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाली . सध्या माणसांच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईल या नवीन गरजेचा समावेश करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सेवा व सुविधांमुळे आणि त्याच्या वापराच्या नित्य सवयींमुळे माणूस मोबाईल शिवाय काही क्षण सुद्धा राहू शकत नाही. एक तर हातात किंवा खिशात मोबाईल नसेल तर माणूस अक्षरशः अस्वस्थ होतो. मोबाईल हा गॅझेट प्रमाणे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जात आहे.  माणसाला खीळ ठेवणाऱ्या अनेक सुविधा वापरल्या जातात, उदाहरणार्थ सोशल मीडिया, विविध गेम्स, व्यवसाय किंवा नोकरीसाठी आवश्यक ॲप्स, शिक्षण रोजगार यासाठीचे ॲप्स, मनोरंजनासाठीचे ॲप्स, त्याचप्रमाणे स्वतःची मते व  विचार प्रसारित करता येणारी समाज प्रसारमाध्यमे अशा अनेक सुविधांमुळे माणूस सध्या मोबाईलचा जणूकाही व्यसनी झालेला दिसतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक लहान मुले. तरुण, प्रौढ व्यक्ती घराबाहेर पडुन मैदानी खेळ खेळणे खेळण्याऐवजी जणूकाही मोबाईल लॉक डाऊन झाले आहेत. त्यांनी स्वतःच स्वतःला लॉक डाऊन करून घेतलेले आहे.                             सध्या कोरोना विषाणूच्या जागतिक संसर्गामुळे जगातील मानव जातीचे अतीव नुकसान होत आहे.जगाची प्रगती खंडित झाली, सर्व अर्थव्यवस्था स्थगित झाली तसेच मानवी जातीची असुरक्षितता वाढली आहे. या काळात जगातील सर्व देशांच्या शासनाने लॉक डाऊन व संचार बंदीचे आदेश दिले आहेत. जगातील प्रचंड लोकसंख्या आहे तेथेच थांबली आहे. अशा भयावह काळात माणसाला सध्या मोबाईल चांगली साथ देत आहे. फेसबुक, व्हाट्सएपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गजन्य रोगाविषयी जागृती होत आहे. शासनाने काढलेले वेगवेगळे आदेश अल्पकाळात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी खूप मदत होत आहे. कोरोना संकट काळात अनेक तरुण फेसबुकवर विविध मोहिमा चालवत आहेत. जस की बार्शीतील एक युवक कोरोना विरोधात फेसबुक लाईव्ह वरून we will win मोहीम राबवित आहे.  यामुळे संकट काळातही जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत आहे. मोबाईलचा वापर चांगला की वाईट याविषयी चर्चा करण्याऐवजी सर्व जगाला लॉक डाऊन मध्ये आहे तेथेच थांबून खिळवून ठेवण्याची ताकद असणाऱ्या व आधुनिक काळातील जागृतीचे उत्तम साधन म्हणून मोबाईलचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच. म्हणूनच सध्या असे वाटते , बरे झाले देवा! मोबाईलचा शोध लावला.

बारावी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा २०२६ साठी आदर्श नमुना उत्तरपत्रिका १

आदर्श नमुना उत्तरपत्रिका Model Anser Sheet रयत शिक्षण संस्थेचे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. सराव परीक्षा उत्तरपत्रिका क्र...